Tuesday, June 30, 2015

ट्रेक..

सळसळणारा वारा,तापलेला रस्ता,डोक्यावर ऊन,तळपणारा सूर्य,वाटेतले दगड,माती,काटे कुटे झाडं झुडूप, चांगलीच जमलेली भट्टी!वेळ भर दुपारची..ठिकाण कुठल्याही किल्ल्यावर नेणारी पायवाट! आत्ता आठवायचं कारण म्हणजे बरेच दिवस ट्रेक ला गेलं नाही कि पाय शिवशिवायला लागतात.आजूबाजूचे रस्ते,चकचकीत दुकानं, गाड्यांची गर्दी,तीच ती रोजची माणसं हे सगळं नाहीसं होऊन असंख्य पायवाटा,खाचखळगे, घामाने ओघळलेल आपलच मळकट शरीर, पाठीवरचं जगभरच ओझं,आपलं विश्व, वाटेत लागणारी कारवी सारखी झाडं,एरवी ऐकू न येणारे पण साद घालणारे पक्षी खुणावायला लागतं.बेलाग कडे साद घालू लागतात.एरवीचं आपलं आखीव रेखीव आयुष्य सोडून मन गडकिल्ल्यांवर धाव घेतं.
सूर्याचं उगवणं मावळणं तसं रोजचंच,गडावरून कसं काय इतकं वेगळं दिसत असावं?रोजच्या काट्यावरच्या धावपळीत न दांडी मारता अविरत duty करणारे सुर्यनारायण आपण बघायलाच विसरतो म्हणून कदाचित गडावरचा सूर्योदय,सूर्यास्त इतके देखणे वाटत असावेत. अवघड वळणं,चढ पार करुन दामेलेल आपलेच हात-पाय!किल्ला सर केल्यावर थकवा हा शब्दच आपण विसरलेलो असतो.एका अनामिक ओढीने न थकता कितीही अवघड क्षण आपण पार केलेले असतात.ज्या क्षणी आपण गडावर पाउल ठेवतो तो क्षण खरच अवर्णनीय असतो.पेट्रोलचे वाढलेले भाव,salaryउद्या होणार,रजा अजून Approve  नाही केली, अशा व्यावहारिक सुखांपासून आपण केव्हाच लांब आलेलो असतो.एका निखळ अनुभवाचे साक्षीदार झालेलो असतो.निसर्गाच्या हाकेला आपण प्रतिसाद दिलेला असतो!एरवीचं आपल्या घरातल्या खिडकीतलं आभाळ आता मोठं झालेलं असतं.रोजच्या २-४ ओळखीच्या चांदण्या आता या मोठ्या आभाळात हरवून गेलेल्या असतात.आता क्षितीजं मोठी झालेली असतात.चंद्र जास्तं जवळचा वाटतो.झाडं,दगड-माती सगळे आपल्याशी संवाद साधू लागलेले असतात.शब्दांशिवाय आपल्याला सारं काही काळू लागलेलं असतं.प्रतिसाद दिला जातो.अगदी आपल्याही नकळत!सोनकीची चिमुकली फुलं आपल्याकडे बोळकं पसरून गोड हसत असतात.तिन्हीसांजेच्या वेळी आभाळात निळे-जांभळे रंग गर्दी करतात.चित्रकलेत शून्य असलेले आपण इतके रंग बघून हरखून जातो.एकरूप होतो!आपला असा वेगळा रंग उरत नाही.थोडा चंद्राचा,थोडा मातीचा,थोडा त्या गडद निळ्या आसमंताचा..सगळे रंग आपल्यात सामावून जातात!जणू काही आपण याहून वेगळे नाही..
शिल्लक उरलेल्या इतिहासाच्या खुणा गोष्टी सांगू लागतात.तटबंदीवर पहारे दिलेल्या तोफा,देवळावर,बालेकिल्ल्यावर फडकणारा झेंडा त्याची साक्ष देत असतो.किल्य्यावर वस्तीला असलेली माणसं,किल्ल्याचा कारभार,असंख्य मोहिमा,लढे सगळं काही त्यात सामावलेलं असतं.त्या मातीशी आपली नाळ जोडली जाते.नकळत!

हळूहळू पहाट होते.आपलं सगळं विश्व त्या सोनेरी पिवळ्या रंगात न्हाऊन निघतं.पावलं जड होतात.पुन्हा नव्याने गवसलेल्या या जिवलग क्षणांना सोडून जायची वेळ येते.परतीच्या वेळेस पुन्हा विचार सुरु होतात.पुढच्या ट्रेकचे plans आधीच डोक्यात ठरले जातात.४ फुलं झाडं,पाखरं आता ओळखीची झालेली असतात.तूर्तास लांब गेलेले असतात.तटबंदी पलीकडची खुशाली कळवेल याची खात्री असते.
पुन्हा नव्याने आपण आपल्या जुन्या विश्वात परततो..मनातल्या नव्या क्षितीजांसोबत...खिडकीतलं आपलं आभाळ आता वाढलेलं असतं.

चप्पलवारी!

लोकांना बरीच टेन्शन्स असतात पैश्याचं करिअरचं लग्नाचं आणि अजून कसलं
कसलं मला टेन्शन आहे ते चपलेच.इतक्या वर्षांच्या अनुभवातून ते निर्माण
झालं असावं असा माझा आता अंदाज आहे.त्याचं की आहे कि माझं न चपलेच जरा
सख्य जास्तं आहे.चप्पल घेण्याइतका किंवा मापाची चप्पल मिळण्याइतका आनंद
नोबेल मिळालेल्या माणसापेक्षा जास्तं असतो माझा.हल्ली आजूबाजूची लोकं
संशयाने बघायला लागतात म्हणून मी तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवला आहे.

आता प्रश्न पडेल कि इतका आनंद का?मापाची आणि अवडीची चप्पल घालण्याइतकं
सुख नाही.बर लहान असताना गोष्ट वेगळी होती.अक्कल नसताना कोणतीही चप्पल
भारी वाटण्याचं वय होतं! मुळात शाळेच्या गणवेशात मोडणाऱ्या शूज आणि चपलाच
पूर्ण वेळ पायात असायच्या.खेळताना आपला आणि चपलांचा फारसा संबंध येईलच
असाही नसायचं.खांब खांब खेळताना खेळताना खांब म्हणून करण्याइतकं चपलेला
‘अनन्यसाधारण’ महत्व होतं.वय वाढत गेलं तशी अक्कालही आणि पायही! विशेष
अशा घडणीचा किंवा ‘अवघडणीचा’ पाय मला लाभल्याने चप्पल घेणं हा shopping
चं एक भाग नसून ती एक यात्रा असते.माझा अंगठा मला नेहमीच कासवासारखा
वाटतो, मान पूर्णपणे बाहेर काढलेल्या कासवासारखा! प्रत्येक चापलेतून तो
बाहेर येतो.तो पूर्ण पणे आत राहील अशा बहुरंगी विविध प्रकारच्या चपला
आजकाल माझ्या स्वप्नातही येऊ लागल्या आहेत.मला पूर्ण आवडलेली आणि संदर
मापाची अशी चप्पल मिळाली आहे असं  स्वप्नं पडलं कि दिवस सुद्धा छान जायला
लागला आहे.कॉलेज शाळा अशा ठिकाणी चपलांवर फारसं लक्ष मी तरी दिल्याचं मला
आठवत नाही.floters नामक जादुई चप्पल माझ्या जीवनाचा आजपर्यंत अविभाज्य
घटक होती.हे जादुई रसायन पायात चढवलं कि आमची गाडी बाहेर जायला तयार
असायची.परंतु आता ऑफिस चालू झाल्यापासून या पंढरीच्या वाऱ्या वाढायला
लागल्या आहेत. शोधून देव सापडतो तुला चप्पल नक्की मिळेल असाही आता मला
माझा मित्र परिवार सांगू लागला आहे..भोळे वारकरी.मनात श्रद्धा ठेउनच या
वारीला माझ्याबरोबर बाहेर पडतात.आणि म्हणूनच हि यात्रा सफल होते ह्यावर
माझं आता पूर्ण विश्वास बसलेला आहे.हा तर.. HR नामक जातीवर किंवा समस्त
अश्या सगळ्या लोकांवर ज्यांनी Formals हे गोंडस नाव देऊन विशिष्ठ अशा
चपलांचा त्यात समावेश केला आहे त्यांचा मला विशेष राग यायला लागला आहे.
चप्पल तुटली कि खूप मोठं संकट आल्यासारखा मला वाटू लागतं. आणि इथूनच हि
वारी सुरु होते.मनात श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेऊन वारकऱ्यांना गोळा करुन
मी लगेच घराबाहेर पडते. कालही वारी सुरु झाली.त्या निमित्ताने हे
लिखाण.२० दुकानं फिरले असेन मोठी छोटी, खूप मोठी खूप छोटी.सगळीच. वारी
म्हंटलं कि भेदभाव नाही.सगळ्या patterns, designs च्या विविध रंगी चप्पल
खुणावत होत्या. नक्की आपला देव कुठला ओळखावा? प्रत्येकं ठिकाणी पायी
निराशा येत होती.दुकानातली सगळ्यात मोठी चप्पल मला छोटी व्हावी या वर
काहीच उपाय दिसत नव्हता. अखेर चप्पल झिजवत दुकानं पालथी घालत शेवटच्या
दुकानात चपलांनिशी प्रवेश केला.तिथे इतक्या भयंकर रंगाच्या चपला बघून
डोळ्यांसमोर अंधारी आली..ती अंधारी कदाचित इतक्या चपला शोधूनही आली
असावी.सांगता येत नाही..! तर, अशा रीतीने मापाची आणि आवडीची अशी चप्पल
घेण्यात मला यश मिळालं.त्यात अनेकं वारकऱ्यांची साथ लाभली, दुकानदारांनी
न थकता माझ्या वारीत मोलाची साथ दिल्याबद्दल त्यांचेही मी आभार
मानले.विविध वेळी वेगवेगळ्या ववारकऱ्यांनी मला मला अशीच मदत केली आहे.अशी
अवघड यात्रा केल्यानंतर कुठे त्या चपला हाती..आपलं पायी मिळाल्या!या मागे
बराच अभ्यास खूप मेहेनत अशक्य चिकाटी असते.आणि म्हणूनच तो आनंद खूप मोठा
असतो..त्यासाठी अनेकांच्या चपला झिजलेल्या असतात.पण इतरांना त्या लगेच
मिळणार असल्याने त्यांचा प्रश्न नसतो. माझ्यापेक्षा बहुदा इतरांना काकणभर
जास्तं आनंद झाला असतो अशी खात्री आजकाल मला पटलेली आहे.नवीन चपले बरोबरच
एक समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर मला हल्ली दिसू लागलं आहे. किमान पुढचे
४-५ महिने वारी नसल्याने तमाम वारकरी निश्चिंत मनाने या पुढे मला भेटू
शकतील अशी अशा आहे.पायातल्या चपलेन पोटात गोळा  येण्याच्या घटना नाहीतर
तशा विरळच! ते सुद्धा इतरांच्या!म्हणूनच कि काय लिंबू मिरची ऐवजी आजकाल
माझ्या परिचयातली अनुभवी वारकरी मंडळी आजकाल छोटी चप्पलच सोबत ठेवत असतील
अशी दाट शंका मला यायला लागली आहे!!असो, या वारीत सहभागी झालेल्या तमाम
अनुभवी वारकऱ्यांचे मनापासून आभार! त्यांच्यासारखी सोबत असल्याने चप्पल
तुटली तरी आधी इतकी भीती न वाटता मी माझी चप्पल वारी यशस्वी करू शकते!!

ता. क- कालच नवीन चपलांची खरेदी झाली आहे!